गोडव्याचा शोध
तो अनादी काल होता. आदिमानव रानावनात दरी डोंगरात राहत होता. अन्नाच्या शोधात भटकत होता. अरण्ये घनदाट होती. कधी सोसाट्याचे वारे व्हायचे, मेघांचा गडगडाट व्हायचा. उन्हाळ्यात वडवानलाने अरण्ये भडकायची. झाडाच्या ढोल्या नाहीतर डोंगरकपारीमधल्या गुहांचा निवारा असायचा. जंगली पशु आणि निसर्गाची रुद्र रूपे यांच्याशी संघर्ष चालायचा. हजारो वर्षे असा संघर्ष करीत माणूस विकसित होऊ लागला. जंगलातील जांभळे, करवंदे ,कांगुण्या, पेरू आंबा केळी अशी फळे चाखता चाखता गोडवा म्हणजे काय हे अनुभवले. झाडाझुडपावर मधमाशांच्या पोळ्यात थबथबून भरलेल्या मधाचा गोडवा, वेगवेगळ्या जंगली फळांचा गोडवा, ज्वारी मक्याच्या वनस्पतींच्या ओल्या घाटातील रस्ता चा गोडवा आणि दर्भासारख्या गवतापासून विकसित झालेल्या उसाच्या पेरातल्या रसाचा गोडवा!! गोव्याच्या अनुभवाचा विकास वायला सुद्धा हजारो वर्षे लागली असतील. वैदिक ऋषींनी नमूद केले मधुमान् नो वनस्पती:|आमच्या वनस्पती मधुमान आहेत. गोडी चे प्रमुख साधन समजली जाणारी वनस्पती रसातून उद्भवलेली शर्करा ही दिव्य आहे. सूर्य, वरून, वायू, पृथ्वी यांच्या संयोगाने निर्माण झालेली ही शर्करा दिव्य आहे...